शनिवार, २९ डिसेंबर, २०१२

ती तर म्हणते, ती मेलेलीच नाही


न घेतलेल्या मुलाखती
विक्रम महिमानगडकर

ती तर म्हणते, ती मेलेलीच नाही

   सध्या ज्या विषयावरून आज वादळ देशभर घोंगावते आहे, त्या दिल्लीतल्या बलात्कारितेला कोणाला भेटू दिले जात नव्हते. त्यामुळे कुठल्याच वाहिनी वा वृत्तपत्राला या संपुर्ण प्रकरणात तिचे मत वा भूमिका काय आहे, त्याचा छडा लागला नाही. एकच बातमी तिच्या शुद्धीवर येण्याचा हवाला देऊन आलेली आठवते, तिने डोळे उघडताच विचारले, ‘त्या गुन्हेगारांना पकडले का?’ जणू शेवटची इच्छा असल्यासारखे बोलून ती गप्प झाली, त्यानंतर तिच्याकडून काही ऐकायला मिळालेले नाही. बाकी्चा जो दोन आठवडे कल्लोळ चालू आहे त्या दंतकथा आहेत. कोणीही मनात येईल ते आणि आपल्याला वाटेल ते बरळतो आहे. ज्या घटनेने आणि ज्या मुलीमुळे देशात इतका गाजावाजा झाला; तिचे मत कसे समोर यायचे? कोणी तरी तिची मुलाखत घ्यायला नको का? तिचीही बाजू आहे आणि ती जगासमोर यालला हवी. त्या बलात्कारातल्या एक आरोपीने स्वत:ला फ़ाशी द्यावे, असेही सांगून टाकले आहे; तर मुख्य आरोपीने मुलीने प्रतिकार केल्याने प्रकरण विकोपास गेल्याचा दावा केला आहे. पण त्या मुलीची बाजू काय आहे? इतकी गोपनियता राखली गेली आहे, की आता ती मरण पावली यावर तरी किती विश्वास ठेवायचा? निदान माझा तरी त्या मृत्यूवर विश्वास नाही. म्हणूनच मी तिला सगळ्यांचा डो्ळा चुकवून गाठले आणि तिची मुलाखत मनातल्या मनात उरकून टाकली. आता तिचे नाव गोपनिय राखायचे असल्याने इथे सोयीसाठी तिला अनामिका म्हणूया.

प्रश्न- सलाम अनामिका, सलाम.
अनामिका- बोला, काय विशेष?
प्रश्न- तुझ्या मृत्यूची बातमी सगळीकडे गाजते आहे, म्हणून म्हटले तुझ्याकडून खात्री करून घेऊ.
अनामिका- माझ्या मृत्यूची बातमी? कोणी दिली? या मीडियाला वेड लागले आहे. काहीही थापा मारतात. एकालाही अक्कल नाही. मी कशाला मरते? चांगली ठणठणीत आहे मी.
प्रश्न- पण तुझ्यावर उपचार चालू होते, तुला वाचवायचे आटोकाट प्रयास डॉक्टर करीत होते?
अनामिका- ते खरेच आहे. माझ्यावर उपचार करणे भागच होते. एवढी मोठी झुंज दिली; मग थोड्याफ़ार जखमा व्हायच्याच ना? मलमपट्ट्या वगैरे कराव्या लागणारच ना?
प्रश्न- मलमपट्ट्या? आम्ही तर ऐकले  तुझी मृत्यूशी झुंज चालू होती?
अनामिका- खरे आहे ते. पण ती झुंज इस्पितळात नव्हे; दिल्लीच्या हमरस्त्यावर धावणार्‍या बसमध्ये चालू होती आणि तेव्हा मला एकटीलाच लढावे लागले मृत्यूशी. कुठला डॉक्टर वगैरे नव्हता माझ्या सोबत.
प्रश्न- मृत्यूशी झुंज? धावत्या बसमध्ये? आम्ही तर ऐकले, की बसमध्ये तुझ्यावर बलात्कार झाला?
अनामिका- मिस्टर, जो निमुटपणे सहन केला जातो त्याला बलात्कार म्हणतात. मी गुपचुप सहन केला नाही तो हल्ला. मी झुंज दिली स्वत:ला वाचवण्यासाठी. माझी इज्जत सुरक्षित राखण्यासाठी झुंजले मी. शरण नाही गेले, त्या सैतानांना किंवा माझा आत्मसन्मान नाही मरू दिला. त्याच्यासाठीच झुंजले मी. देह काय साधी गोष्ट असते. आत्मसन्मान म्हणजे माणुस असतो. मग तो पुरूष असो की स्त्री असो.
प्रश्न- म्हणजे तुझ्यावर झाला तो बलात्कार नाही असे म्हणा्यचे आहे काय तुला?
अनामिका- अजिबात नाही. माझ्या स्त्रीदेहावर लैंगिक हल्ला झाला होता आणि त्यापासून माझा एक नागरिक म्हणुन बचाव करणे; ही पोलिसांची व सरकारची जबाबदारी होती. ती त्यांनी पार पाडली नसेल तर त्यांच्यावर बलात्कार झाला म्हणा. माझ्यावर नव्हे. सरकार आणि पोलिसांचे बळ तोकडे लुळे पडले, तर जो शिरजोर झाला; त्याने त्यांच्यावर बलात्कार केला. माझ्यावर नव्हे.
प्रश्न- तुझ्यावर आणि तुझ्या देहावर यात फ़रक काय पडतो? बलात्कार तो बलात्कारच ना?
अनामिका- खुप मोठा फ़रक आहे. मी म्हणजे माझा व्यक्ती म्हणून असलेला आत्मसन्मान असतो, त्याचा बचाव किंवा रक्षण सरकार नाही करू शकत. ते संरक्षण माझे मलाच करावे लागते. माझ्या देहाच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची असते, पोलिसांची असते. मी त्यासाठी कधीच सरकारवर अवलंबून नव्हते. म्हणूनच माझी अब्रू राखायला पोलिस येतील वा कायदा काय म्हणतो, त्याची पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांप्रमाणे मी वाट बघत बसले नाही. मी माझ्या आत्मसन्मानाचा प्राणपणाने बचाव केला. शरीराला होणार्‍या वेदना, जखमांची पर्वा केली नाही. ती माझी जबाबदारी नव्हतीच. ज्यांची होती ते सरकार व पोलिस नामर्द असतील तर त्याला मी काय करू?
प्रश्न- म्हणजे याचा अर्थ काय अनामिका? सगळे जग म्हणते आहे, की तु बलात्काराची बळी आहेस आणि त्यातच तुझा म्रूत्यू झाला. मग तुच त्याचा इन्कार कसा करते आहेस?
अनामिका- कारण जे असे बोलत आहेत, त्यांना काय झाले वा काय होते आहे त्याचाच थांगपत्ता लागलेला नाही. इथे बलात्कार स्त्रीवर होत नसतो. आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे ना? देशाची राज्यघटना आहे ना? त्यानुसार चालणारी संसद आणि तिला जबाबदार असलेले सरकार आहे ना? मग त्या राज्यात बलात्काराची कोणाला मोकळीक असते का? कायदा ती मोकळीक देतो का? नसेल तर बलात्कार होऊच कसा शकतो? व्यक्तीवर होत असेल तर तो व्यक्तीगत हल्ला असतो. पण असा हल्ला हे त्या प्रस्थापित कायद्याच्या, घटनेच्या, संसदे्च्या आणि सत्तेच्या बळाला दिलेले आव्हान असते. त्यात जो आव्हान देतो, तो बळाने मात करीत असेल; तर तो बलात्कार असतो कायद्यावरचा. म्हणून बलात्कार झाला तो माझ्यावर नाही.
प्रश्न- कमाल आहे तुझी अनामिका. इतका लढा देऊनही तू इतकी बिनधास्त आहेस?
अनामिक- का असू नये? मी त्या हल्लेखोरांचा तुल्यबळ सामना केला. मला लाज वाटायचे काय कारण आहे? ज्यांच्यावर बलात्कार झाला त्यांना शरम वाटावी. जे नामर्द ठरलेत, त्यांनी माना खाली घालाव्यात. कारण हल्लेखोरांनी माझ्यावर शारिरीक हल्ला केला. तो प्रत्यक्षात कायद्याचे राखणदार व पोलिस, सरकार यांच्यावरचा बलात्कार आहे. त्यात मेले असेल तर सरकार मेले आहे. मारला गेला असेल तर कायदा मारला गेला आहे. बळी पडला असेल तर न्यायाचा बळी पडला आहे. माझ्या आत्मसन्माला धक्काही लागलेला नाही. तो अत्यंत सुरक्षित आहे. कारण माझ्या आत्मसन्मानावरून मी जीव ओवाळून टाकला आहे. त्याचा मला सार्थ अभिमान आहे.
प्रश्न- व्वा, अनामिका. सलाम तुझ्या धाडसाला. शौर्याला.
अनामिका- माझ्याच कशाला? या देशातल्या कुठल्याही मुलीच्या अंगात तेवढीच हिंमत व आत्मसन्मान आहे. त्यांना सलाम करा, त्यांचा गौरव करा. तसा प्रसंग आला तर त्याही अशाच झुंजतील. कारण या देशात आता आपले सरकार, राज्यकर्ते व कायद्याचे अंमलदार बलात्कारित म्हणून शरमेने मान गुडघ्यात घालून बसलेत. प्रत्येक महिलेला व मुलीला आता आपल्या देहावर होणार्‍या हल्ल्याची पर्वा न करता; स्वत:च्या आत्मसन्मानासाठी म्हणजे अब्रुसाठी झुंज द्यावी लागणार आहे. त्याचे त्या प्रत्येक मुलीला माझ्या अनुभवानंतर भान आले आणि त्यांनी रस्त्यावर उतरून त्याची साक्ष दिलीच ना? मग त्यांच्या शौर्य व हिंमतीला तुम्ही लोक दाद का देत नाही?
प्रश्न- म्हणजे कायदा व सरकार महिलांच्या अब्रूचे रक्षण करू शकत नाही असा आरोप आहे तुझा?
अनामिका- आरोप? काय बघितलेत दोन आठवड्यात? तुमचे डोळे. मेंदू तुम्हाला काही सांगत नाही? माझ्यावरच्या हल्लेखोरांचा बंदोबस्त करायचे सोडून पोलिस व सरकार काय करत होते? ज्यांच्यावर, म्हणजे ज्या सरकार, कायदा, न्यायावर त्या हल्लेखोरांनी त्या रात्री धावत्या बसमध्ये बलात्कार केला; त्याचा निषेध करायला तरूण मुली, महिला व जनता रस्त्यावर उतरली, तेव्हा त्यांची मुस्कटदाबी करायला कोण पुढे सरसावले होते? तेच बलात्कारित पोलिस व सरकारच आले ना पुढे?
प्रश्न- म्हणजे?
अनामिका- होय, बलात्कार मझ्यावर झालेला नाही, कायद्याच्या राज्यावर बलात्कार झाला आहे. पण त्याचा निषेध करायचीही सरकारला भिती वाटते आहे. असे सरकार वा कायदा कोणाचे संरक्षण करणार आहे? हे ओळखूनच त्या मुले मुली रस्त्यावर उतरल्या होत्या. हल्लेखोर बलात्कार्‍यांना खुले आव्हान द्यायला. आणि सरकार व पोलिस काय म्हणत होते? शांततेने घ्या. काय घ्या शांततेने? बलात्कार शांततेने घ्यायचा असतो? मला नुसती शक्यता दिसली तर मी त्या हल्लेखोरांवर प्रतिहल्ला चढवला होता. आणि ज्यांच्यावर उघड बलात्कार झाला तो कायदा व सरकार मात्र शांततेने घ्या म्हणते?
प्रश्न- थोडा नजूक प्रश्न आहे. तू म्हणतेस तुझा मृत्यू झालेलाच नाही. मग तुझा मृतदेह आणला जाणार आहे त्याचे काय?
अनामिका- तो माझा देह मरण पावला असेल. पण मी व्यक्ती वा नागरिक म्हणून माझा आत्मसन्मान असतो तो चांगला ठणठणीत आहे. सुखरूप आहे. नुसता जिवंत, ज्वलंतच नाही तर करोडो भारतीयांना संजीवनी देतो आहे. कित्येक वर्षे मरून पडलेल्या आत्मसंन्मानाला मी जिवंत केले असेल; तर मी मरण पावले ही अफ़वाच नाही काय? देशाच्या गृहमंत्र्यांना, पंतप्रधानांना ते मुलींचे बाप आहेत याचा विसर पडला होता, त्याची आठवण मी करून दिली, तो मरणाचा पुरावा आहे, की माझ्या जिवंतपणाचा?
प्रश्न- मग मृतदेह कोणाचा आणला जातोय? अंत्ययात्रा कोणाची काढली जाणार आहे?
अनामिका- सरकारची, कायद्याची, न्यायाची, ज्यांच्यावर बलात्कार झाला आणि त्याच जखमांनी त्यांचा मृत्यू झाला; त्यांची आता शाही इतमामाने अंत्ययात्रा काढली जाईल. अंत्यसंस्कार केले जातील. त्यानंतर आपल्या अब्रू व आत्मसन्मानासाठी नागरिकांच सज्ज रहायचे आहे; याचे भान आल्यानेच करोडो भारतीय रस्त्यावर उतरले आहेत. ज्याने त्या करोडो मृतवत भारतीयांचा आत्मसन्मान जिवंत केला; ती मेली यावर कोण विश्वास ठेवील का?
(दैनिक ‘आपलं महानगर’ रविवार ३० डिसेंबर २०१२)

बुधवार, ५ डिसेंबर, २०१२

आनंदाचा ‘राजा’ आंबेडकर




  काल बुधवारी परदेशी गुंतवणुकीची चर्चा संसदेत चालू व्हायची असताना मायावती यांच्या पुढाकाराने राज्यसभेत जो गोंधळ घालण्यात आला तो पाहिला मग आजच्या आंबेडकरी चलवळीप्रमाणेच एकूण दलित चळवळींची दिशा कुठे भरकटली आहे; त्याचा अंदाज येऊ शकतो. उत्तरप्रदेशात आपली अबाधित पाच वर्ष सत्ता असताना मायवतींनी शेकडो स्मारके उभी करण्याचा सपाटा लावला होता. त्यात त्यांनी बाबासाहेबांचा आडोसा घेऊन प्रत्यक्षात सरकारी खर्चाने स्वत:चीच स्मारके उभी करून घेतली आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना आपली सत्ता गमवावी लागली. कारण दलितांच्या कल्याण व उद्धाराच्या वल्गना करीत त्यांनी स्वत;ची संपत्ती वाढवलीच. पण स्वत:चीच स्मारकेही उभी करून घेतली. म्हणजेच अन्य राजकीय पक्षांपेक्षा आंबेडकरी विचारांचे झेंडे खांद्यावर घेतलेलेही कसे आपलीच तुंबडी भरताना दलिताला विसरतात, त्याचा उत्तम नमूना त्यांनी पेश केला. पण त्याचवेळी जेव्हा जेव्हा युपीए सरकारला अडचण भासली; तेव्हा आपली संसदेतील ताकद त्या सरकारच्या मागे उभी करताना, मायावतींना मुंबईतील बाबासाहेबांचे स्मारक किंवा इंदू मिलच्या जागेचे एकदाही स्मरण झाले नव्हते. त्या सौदेबाजीमध्ये त्यांनी युपीएची अडवणूक केली असती; तर हे काम कधीच होऊन गेले असते. पण स्वत:ला सीबीआयच्या तावडीतून सोडवण्यापेक्षा मायावतींची संसदेतील ताकद कधी आंबेडकर विचारांसाठी वापरली गेल्याचे दिसले नाही. मात्र आता सरकार इंदू मिलच्या विषयात अंतिम निर्णय घेणार असे स्पष्ट झाल्यावर; मायावतीही त्या गर्दीत घुसल्या आणि महाराष्ट्रातील आंबेडकरी संघटनांप्रमाणे त्यांनीही श्रेय मिळवण्याची कसरत केली. इकडे गेले काही दिवस त्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू होतीच.

   गेले वर्षभर इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी मिळाली पाहिजे म्हणून सगळेच रिपब्लिकन गट व पक्ष आवाज उठवत होते. पण ही मागणी इतकी वर्षे जुनी असताना, अचानक गेल्या एकाच वर्षात त्यासाठी सर्वांनी आटापिटा कशाला सुरू केला? दरवर्षी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनी जी अलोट गर्दी शिवाजीपार्क दादर येथे चैत्यभूमीवर जमा होते, तिच्यासमोर आपले चेहरे पेश करायला धावपळ करणार्‍या या नेत्यांनी मागल्या किती वर्षात जरा पलिकडे जाऊन इंदू मिलचे दार ठोठावले होते? कोणी तिकडे फ़िरकला सुद्धा नव्हता. एका तरूणाने गेल्या वर्षी आजच्याच दिवशी ती मजल मारली आणि या स्मारकाचा व त्यासाठीच्या जमीनीचा विषय एकदम ऐरणीवर आला. आज त्याची कोणाला आठवण तरी आहे काय? त्याचे नाव आनंदराज आंबेडकर. म्हणजे बाबासाहेबांचा धाकटा नातू. सहसा कोणी कधी ऐकली नसेल अशी त्याची संघटना आहे, रिपब्लिकन सेना. त्याच सेनेच्या कार्यकर्त्यांनी गतवर्षी गनिमी कावा करून इंदू मिलवर बाबासाहेबांच्या स्मारकाचा ध्वज फ़डकावला होता. सगळे नेते शिवाजीपार्क व चैत्यभूमीवर गर्दीला आपले मुखवटे दाखवत असताना; गर्दीकडे पाठ फ़िरवून आनंदराज व त्यांच्या सहकार्‍यांनी थेट बाजूला ओसाड पडलेल्या इंदू मिलकडे मोर्चा वळवला आणि तिथे घुसून कब्जा केला. त्याचा गवगवा झाल्यावर भीमसैनिकांची गर्दी तिथे लोटली. मग त्यांना पोलिस लावून आवरणे शक्य नव्हते. आणि आनंदराजच्या पाठीराख्यांनी नुसता देखावा उभा केला नाही. त्यांनी ६ डिसेंबर उलटला तरी तिथेच ठाण मांडून सरकारकडून जमीन देणार असल्याचे वदवून घेतले. आम्हाला त्याचे कौतूक एवढ्यासाठीच आहे, की या मुलाने आपल्या पित्याचा खरा वारसा चालविला आहे.

   आनंदराज आंबेडकर हे नाव फ़ारसे लोकांना ठाऊक नाही. याचे कारण हा तरूण गाजावाजा न करता भरकटलेल्या आंबेडकरी चळवळीला मार्गावर आणायची एकाकी लढाई लढतो आहे आणि त्यात त्याने प्रसिद्धीपेक्षा लोकांमध्ये राहून काम चालविले आहे. त्यामुळेच पत्रके काढणे वा चर्चासत्रे भरवून जनमानसात आपली उंच प्रतिमा उभी करणे; यापासून तो दूर असतो. आणि त्याचा संयमी ध्येयवादी पिताही तसाच होता. त्यांचे नाव भय्यासाहेब आंबेडकर. ज्याला आज चळवळीत सूर्यपुत्र म्हणून ओळखले जाते. त्यांनी पित्याच्या निर्वाणानंतर त्यांचा राजकीय वारसा मिळवण्यापेक्षा त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन काम करायची अखंड धडपड केली. मुंबईतला बाबासाहेबांचा पहिलाच भव्य पुतळा उभारण्यातही अशी टाळाटाळ व अडवणूक झाली होती. पण भय्यासाहेबांच्या अथक व संयमी प्रयत्नांमुळेच ते स्मारक २६ जानेवारी १९९६२ रोजी ओव्हल मैदानाजवळ उभे राहिले. त्याचेही श्रेय घ्यायला आजच्या सारखीच झुंबड उडाली होती. पण त्याकडे पाठ फ़िरवून भय्यासाहेबांनी पित्याचा वैचारिक वारसा मोठा मानला आणि आता त्याच भय्यासाहेबांच्या धाकट्या पुत्राने संयमी, पण नेमक्या कार्यक्रमातून बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचा मार्ग खुला करून दिला आहे. त्यांनी गतवर्षी गनिमी कावा केला नसता तर वर्षभरात हा विषय तडीस लागला नसता. प्रसिद्धीपेक्षा कामावर लक्ष देऊन खर्‍या निष्ठावान आंबेडकरवाद्यांना सोबत घेत, सौदेबाजीपासून दुर असलेल्यांची संघटना उभी करण्याचे आनंदराज यांचे मूळ काम चालू होते; म्हणूनच त्यांना हे यश मिळाले आहे. त्यांनी ऐक्याचे वा एकजुटीचे नारे न लावता, सर्वांना एकत्र यायला भाग पडेल; अशी पावले उचलून हे शक्य करून दाखवले आहे. म्हणूनच आम्हाला वाटते, आजच्या आनंदाचा खरा ‘राजा’ तोच आंबेडकर आहे ज्याचे नाव आनंदराज आंबेडकर आहे. ज्याप्रकारे त्या तरूण नेत्याने स्मारकाच्या विषयाला नेमकी दिशा मिळवून दिली, त्याच प्रकारे त्याने अथक प्रयत्नातून सत्तेच्या सापळ्यात अडकलेली दलित आंबेडकरी चळवळही योग्य दिशेने मार्गावर आणावी; एवढीच त्याच्याकडून आजच्या मुहूर्तावर अपेक्षा. कारण तीच बाबासाहेबांसाठी खरी श्रद्धांजली असेल.

दै. ‘आपलं महानगर’ मुंबई महापरिनिर्वाणदिन ६ डिसेंबर २०१२

रविवार, २५ नोव्हेंबर, २०१२

स्मारकाबद्दल मुंबईला काय वाटते?

पण ज्या मुंबईवर बाळासाहेबांनी जीवापाड प्रेम केले, त्या मुंबईला काय वाटत असेल त्यांच्या स्मारकाबद्दल? ‘आपलं महानगर’ या मुंबईच्या दैनिकात एक उत्तम लेख आलाय त्यावर. मला वाटते, तेवढी सुंदर व चिंतनिय प्रतिक्रिया अन्य कोणाची नसेल.





मुंबईला काय वाटते?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निर्वाणाला आता आठवड्याचा कालावधी लोटला आहे. त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहून माघारी जाताना जे दृष्य़ अमिताभ बच्चनला दिसले, त्यावर त्याने अतिशय मार्मिक भाष्य़ ट्विटरवरून केले होते. वाटेत एका जागी मोठा फ़लक त्याने पाहिला; त्यावर साहेबांचा उल्लेख ‘स्वर्गिय बाळासाहेब’ असा होता आणि असे शब्द कधीकाळी वाचायची वेळ येईल असे वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया त्याने नोंदवली आहे. आज बाळासाहेब नाहीत हे वास्तव मानायला अमिताभचे मन तयार नाही, असेच त्याला सांगायचे आहे. पण दुसरीकडे बघा, त्याच्य़ावर आपलीच निष्ठा व प्रेम अधिक होते; असे दाखवणार्‍यांची कशी जीवघेणी स्पर्धा चालू झाली आहे. दिवंगत बाळासाहेबांचे स्मारक हा विषय आता विनाविलंब वादाचा बनवण्यात आला आहे. कोणी इंदू मिलची जागा स्मारकाला मिळावी असे म्हटले आहे; तर कोणी शिवाजी पार्कवरच त्यांचे स्मारक व्हावे अशी सूचना केली आहे. कोणाला दादर रेल्वे स्थानकाला त्यांचे नाव देण्याची इच्छा झाली आहे. अशा मागण्या सामान्य माणसाला भुरळ घालणार्‍या जरूर असतात. पण त्या मागण्या ठासून करणार्‍यांची मानसिकता चटकन आपल्या लक्षात येणारी नसते. इथेच बघा ना, अमिताभने कधी अशा बाळासाहेबांवरच्या आपल्या प्रेमाचे प्रदर्शन मांडलेले नाही. पण मोजक्या शब्दातून त्याच्या अनिवार वेदनेचा अविष्कार झाला आहे. जो माणूस गेला, त्याच्या मृत्यूचे वास्तव स्विकारणे अमिताभला अवघड जाते आहे. आणि दुसरीकडे त्याच दिवंगत बाळासाहेबांना स्मरणात ढकलण्याची स्पर्धा चालली आहे. जे कोणी हे निष्ठावंत आहेत, त्यांना साहेबांच्या देहांताचे खरेच दु:ख झाले आहे काय? मग स्मारकात त्यांना बदिस्त करण्याची घाई कशाला? अशा वादात अन्य कोणाशी बोलण्यापेक्षा ज्या मुंबईवर बाळासाहेबांनी अतोनात प्रेम केले व तिच्या मराठीपणासाठी सतत आवाज उठवला; त्या मुंबईला आपला हा सुपुत्र गमावल्याचे किती दु:ख झाले ते मला जाणून घ्यावे अशी इच्छा झाली. म्हणून गेला आठवडभर मुंबईला शोधत मुंबईभर फ़िरत होतो.

शेवटी ती मुंबई मला एका संध्याकाळी शिवाजी पार्कच्या कट्ट्याजवळ महाराजांच्या पुतळ्याखाली गुडघ्यात मान घालून बसलेली सापडली. कितीवेळ तिला बोलती करण्यात गेला कोण जाणे? त्या मुंबईच्या तोंडून शब्द फ़ुटत नव्हता. अवघी माध्यमे, वाहिन्या ज्या निधनाचा गदारोळ करत होत्या, मिळेल त्याच्या प्रतिक्रिया घेत होत्या, त्याबद्दल ही मुंबई मात्र अवाक होती, नि:शब्द होती, स्तब्ध होती. येणार्‍याजाणार्‍याचे लक्ष आपल्याकडे जाऊ नये याची काळजी घेत एकटीच आपले दु:ख व्यक्त करत तिथे बसली होती. तिच्या तोंडात शब्द नव्हता; पण डोळे अश्रूंनी डबडबले होते. मला जवळ येताना पाहून मुंबई दचकली, तिने अंग चोरून घेतले. आपण इथे दु:ख व्यक्त करायला आलो; हे कोणाला समजल्याची असहायता तिच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होती. पण कुणाला सांगण्यासाठी वा छापण्यासाठी आलेलो नाही, असे वचन दिल्यावर मुंबई सावरली आणि पदराने तिने डोळे पुसले. मग मी बोलायला सुरूवात केली. तिची विचारपूस केली, तेव्हा तिची खरी वेदना उघड झाली. म्हणाली, ‘किती निर्दय झालाय रे माणूस? माझा सुपुत्र गेलाय जीवनातून उठून आणि यांना स्मारकाचे डोहाळे लागलेत. या माझ्या शरीरावर मुंबईभर काय कमी स्मारके आहेत? कोणी कधी मला हवे नको विचारले का, अशा स्मारकाबद्दल? माझ्या या बाळालाही त्याच अनेक स्मारकांच्या रांगेत नेऊन बसवायला निघालेत.’ मोठी अजब कहाणी होती मुंबईच्या तोंडून ऐकलेली. पण निदान मुंबई बोलू लागली होती

प्रश्न- म्हणजे तुला इथे बाळासाहेबांचे स्मारक व्हावे असे वाटत नाही?
मुंबई- स्मारक म्हणजे काय असते? एक पुतळा? एक भव्य इमारत? कुठल्या रस्त्याला वा वास्तूला नाव देऊन स्मारक होते?
प्रश्न- पण बाळासाहेब खुप मोठे होते आणि म्हणूनच त्यांच्या स्मारकाची मागणी होतेय.
मुंबई- काय विटंबना आहे ही. एका बाजूला खुप मोठे होते म्हणता आणि दुसरीकडे इवल्या स्मारकाच्या गप्पा करता?
प्रश्न- इवले कुठे? भव्यदिव्य स्मारकाची मागणी आहे. त्यासाठीच कोणी शिवाजीपार्क म्हणतोय तर कोणी इंदू मिलची जागा मागतोय.
मुंबई- कशाला भव्य म्हणता? जागेच्या तुकड्याला की त्यावर उभ्या राहिलेल्या इमारतींना भव्य मानता? त्यातून स्मारक होते कारे? त्या भायखळ्याच्या दोन पुलांच्या कैचीत सापडलेल्या खांबावरच्या पुतळ्याचे नाव मला सांगशील? पुर्वी त्याला खडा पारशी म्हणायचे. तेही स्मारकच आहे ना? कोण तो आणि कशाला त्याचे स्मारक उभे केले तिथे? कोणी सांगू शकेल आज? बाळासाहेबाचे तसे स्मारक करणार आहात काय? ज्या रस्त्याने गेल्या रविवारी जनसागर उसळला होता, ती लेडी जमशेदजी कोण सांगता येईल तुला? कसली स्मारके करता रे?
प्रश्न- पण एवढ्या मोठ्या महान व्यक्तीमत्वाला विसरून जायचे?
मुंबई- कोण म्हणतो विसरून जायचे? छत्रपती शिवाजी महाराजांना इहलोक सोडून किती शतके लोटली? विसरून गेले कारे जग त्यांना? आज जागोजागी पुतळे दिसतात त्यांचे? कधी आले हे पुतळ्यांचे पीक? शंभर वर्षातला तर मामला आहे ना? मग मधली अडिचशे वर्षे काय शिवरायांना विसरलो होतो आपण? नसू तर का नाही विसरलो? तो तर युगपुरूष होता. विसरला कोण त्यांना? स्मारक त्यांचे करावे लागते; ज्यांची जगाला ओळखच नसते. याच मुंबईत अनेक जुन्या नावाजलेल्या शिक्षण संस्था शेठजींची स्मारके म्हणुन कित्येक वर्षे उभ्या आहेत. रुईया, रुपारेल, झुनझुनवाला, सोमाणी, छबीलदास हे महानुभाव नेमके कोण होते सांगशील जरा?
प्रश्न- खरेच ठाऊक नाहीत मला.
मुंबई- त्यांची नावे आजही घेतली जातात. पण त्या नावांचा रोजच्या रोज उच्चार करणार्‍या हजारो मुलांना विद्यार्थ्यांना ते कोण तेही ठाऊक नसते. त्याला स्मारक म्हणतात. जपमाळ ओढल्यासारखी जी नावे घेतली जातात, पण ज्यात भावनेचा, भक्तीचा लवलेश नसतो, त्याला स्मारक म्हणतात. बाळासाहेब इतका अनोळखी होता कायरे या मुंबई-महाराष्ट्राला, की त्याचे स्मारक करायला हवे?
प्रश्न- मग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबद्दल काय म्हणशील?
मुंबई- त्यांचे काय? रस्त्याला नाव दिले किंवा कुठे पुतळे उभे केले; म्हणुन बाबासाहेब मोठा माणूस झाला आहे काय? त्या महामानवाची आठवण करोडो लोकांच्या मनात आहे, ती काय या स्मारक किंवा पुतळ्यामुळे आहे? अरे जेवढ्या लोकांना बाबासाहेबांच्या हयातीत ते माहीत नसतील त्यापेक्षा शेकडो पटीने आज त्यांचे नाव लोक उच्चारतात, ते त्या पुतळ्यामुळे नाही, तर त्या महामानवाच्या महान कर्तृत्वामुळे.
प्रश्न- म्हणजे स्मारकाची गरजच नसते?
मुंबई- ज्यांना लोक ओळखत नसतात व ज्यांनी आपल्या कर्तृत्वाची जनमानसावर छाप पाडलेली नसते ना; त्यांची स्मारके करावी लागतात. बाबासाहेब वगैरे असे महामानव आपल्या कर्तबगारीची अशी छाप जगावर सोडून जातात, की ती पुसणेच अशक्य असते. त्यांची कर्तबगारी हेच त्याचे जिवंतपणी त्यांनीच उभारलेले स्मारक असते. ते पुसायला धडपडणारे त्यांचे शत्रू नामशेष होतात, पण ही मोठी माणसे आपल्या स्मरणाच्या अमरत्वाने मरणावरही मात करून जातात. बाबासाहेब, बाळासाहेब, लोकमान्य, गांधीजी अशी माणसे स्मारकाची गरजवंत नसतात. सदोबा पाटिल आठवतो तुला?
प्रश्न- कोण बुवा?
मुंबई- चर्नी रोडच्या उद्यानात कोपर्‍यात एकाकी उभा एक पुतळा आहे ना; तोच आहे सदोबा. त्याने अर्धशतकापुर्वी बाबासाहेबांच्या स्मारकाला जागा देण्याचे सर्व प्रयास हाणून पाडले. तो स्वत:ला मुंबईला सम्राट म्हणवून घ्यायचा. आणि अवघ्या दोन दशकात त्याचे नाव कुणाला आठवत नाही. म्हणून बाबासाहेबांचे विस्मरण झाले कारे कुणाला? त्यांच्या निर्वाणाला आता अर्धशतकाचा कालावधी लोटला आहे. तिसरी पिढी जन्माला आली आहे. त्या पिढीच्या स्मरणात बाबासाहेब कशामुळे आहेत? स्मारकांमुळे की पुतळ्यामुळे?
प्रश्न- त्यांनी दलित व भारतीय समाजासाठी केलेल्या कार्यामुळे.
मुंबई- कार्य नव्हे कर्तृत्वामुळे. अशा कर्तबगार माणसांचे प्रकाशमान जीवनच त्यांचे कायमचे स्मारक असते. त्यांचे त्या त्या शहर, गाव भूभागातले वास्तव्य हेच त्यांचे स्मारक असते. त्यांचे कार्य व विचार पुढे घेऊन जाण्यात खरे स्मारक असते. स्मारक वा पुतळ्याच्या उंचीपेक्षाही प्रचंड उंची असलेल्या कर्तृत्वाची ही अलौकीक माणसे ज्या माझ्या अंगाखांद्यावर उठली, बसली, वागली व जगली त्या भूमीला मुंबई म्हणतात. मग मी मुंबई हेच त्यांचे जितेजागते स्मारक नाही काय? जोवर माझे अस्तित्व आहे; तोवर असे माझे लाडके सुपुत्र अजरामर आहेत. मला त्यांना विसरणे कोणाला शक्य नाही, की माझ्या कुशीत जो कोणी आसरा घ्यायला येईल, त्याला त्या सुपुत्रांना विसरता येणार नाही.
प्रश्न- खरेच आहे ग बाई मुंबई. तू महान आहेस.
मुंबई- मुला, तुला ठाऊक आहे, बाबासाहेब गेले ना तेव्हा वाटले होते, की आता असा दुसरा अविस्मरणिय सुपुत्र माझ्या वाट्याला येणार नाही. पण त्यानंतर लहानमोठे अनेक कर्तबगार माझ्या कुशीत आले, ममतेने मी त्यांचा संभाळ केला. त्यांच्या कर्तबगारीकडे कौतुकाने बघत राहिले. शिवसेना स्थापन झाली तेव्हा ह्याच बाळाच्या खोडकरपणाच्या अनेक तक्रारी मला ऐकून घ्याव्या लागल्या होत्या. आज तो जुना काळ मागे वळून बघताना डोळ्यात अश्रू दाटुन येतात. तीनचार दशकांपुर्वीचा तोच खोडकर बाळ आज बाळासाहेब म्हणून जगाचे डोळे दिपवून अंतर्धान पावला आहे. जसे बाबासाहेबांच्या महानिर्वाणानंतर उर भरून आले होते, तसेच आज झाले आहे.
प्रश्न- म्हणजे स्मारक नको आहे तुला साहेबांचे?
मुंबई- स्मारक कोणी नको म्हटले? माझे हे असे गुणी सुपुत्र स्मारकासाठी लाचार नाहीत, एवढेच मला त्या भांडणार्‍यांना सांगायचे आहे. पण ऐकतो कोण या मुंबईचे हल्ली? जो तो आपल्याच तोर्‍यात व मस्तीत असतो ना?






सौजन्य
दै ‘आपलं महानगर’  रविवार दि. २५ नोव्हेंबर २०१२
न घेतलेल्या मुलाखती, -विक्रम महिमानगडकर

==================================

स्मारकाविषयी इतर मागण्या व विचार पुढीलप्रमाणे आहेत

विविध राजकीय पक्ष , शिवसेनेकडून आलेल्या सूचना :-
* शिवाजी पार्क येथे बाळासाहेबांचे स्मारक बांधा - मनोहर जोशी , शिवसेना नेते
* मुंबई - गोवा कोस्टल माहामार्गाला बाळासाहेबांचे नाव द्या . - यशोधर फणसे , नगरसेवक ( शिवसेना )
* दक्षिण मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाला बाळासाहेबांचे नाव द्या . - रमेश कोरगावकर , नगरसेवक , ( शिवसेना )
* शालेय पुस्तकांमध्ये बाळासाहेबांवरील धड्याचा समावेश करा . - राजू पेडणेकर , नगरसेवक ( शिवसेना )
* बाळासाहेबांच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय संग्रहालय बांधा . - शिवसेना
महापालिकेच्या मुख्यालयाजवळ बाळासाहेबांचा पुतळा उभारा . - शिवसेना
* महापौर बंगल्यात बाळासाहेबांचे स्मारक बांधण्यात यावे . - छगन भुजबळ , सार्वजनिक बांधकाम मंत्री
* मुंबईतील महापालिकांच्या शाळेत बाळासाहेबांच्या नावे वर्त्कृत्व स्पर्धा सुरू करा . - चेतन कदम , नगरसेवक ( मनसे )
* मुंबईतील सर्वात महत्त्वाचे रेल्वे स्थानक असलेल्या दादर रेल्वे स्थानकालाच बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या . - नयना सेठ , नगरसेविका ( काँग्रेस )
* इंदू मिलच्या विस्तृत अशा १२ एकर जागेवर बाळासाहेबांच्या आठवणींशी संबंधित संग्रहालय बांधा . - सुनील मोरे , नगरसेवक ( काँग्रेस )
* नवी मुंबईतील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेबांचे नाव द्या . - दिलीप पटेल , भाजप .
* पुण्यात बाळासाहेबांचे स्मारक व्हावे . - मंगेश तेंडुलकर , साहित्यिक
* ठाणे , औरंगाबाद , अहमदनगर महापालिकांमध्ये बाळासाहेबांचे पुतळे उभारण्यास संमती .